

वसई (प्रतिनिधी)-पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यानुसार आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान जिल्ह्यातील एकूण १ हजार ३१२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व मतदारांची एकूण संख्या १० लाख ४४ हजार १८८ इतकी असून त्यात ५ लाख ३० हजार ६२१ पुरुष तर ५ लाख १४ हजार २२८ महिला आणि ३४ इतर अशी संख्या आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व इतर कर्मचारी असे एकूण ७ हजार २२१ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २६ डिसेंबर २०१९ पासून निवडणूक परिषद प्रशिक्षणाच्या कार्यक्रम ही पार पडला आहे. मतदानासाठी एकूण २ हजार २८४ बॅलेट युनिट तर १ हजार ८५३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम यंत्राचा वापर होणार असून त्यासोबत व्हीव्हीपॅट यंत्र नसेल. एसीआई एलकंपनीचे यंत्र असून ते अत्याधुनिक असल्याच्या दावा प्रशासनाने केला असून १ हजार ३१२ मतदान केंद्रात साठी १ हजार ८५० ईव्हीएम यंत्र वितरीत करण्यात येणार आहेत.
______________________
वसईत ३२ उमेदवार रिंगणात-
वसई पंचायत समितीच्या ७ गण आणि जिल्हा परिषदेच्या ३ गटांसाठीही आज मतदान होत आहे. याठिकाणी कळंब गण व गटात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ३२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी दिली.निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला वसई च्या उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे उपस्थित होते.वसईत बहुजन विकास आघाडी ,शिवसेना व भाजप यामध्ये तिरंगी लढत होत असून तिन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. वसई तालुक्यात तिल्हेर, चंद्रपाडा, भाताणे, मेढे, वासळई, कळंब, अर्नाळा, अर्नाळा किल्ला असे ८ गण तर भाताणे, तिल्हेर, अर्नाळा, कळंब असे ४ गट आहेत.जिल्हा परिषद भाताणे गटात ४,चंद्रपाडा गटात ३ अर्नाळा गटात ३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.तर पंचायत समिती मध्ये भाताणे गण ३,मेढे गण ४,तिल्हेर गण ४,चंद्रपाडा गण २,अर्नाळा गण ३,अर्नाळा किल्ला गण ४,वासलई गणात ३ उमेदवार लढत देणार आहेत.कळंब गटातून निलिमा भोवर या बविआ कडून तर याच गटातून भाजपा च्या अनिता जाधव या बिनविरोध निवडून आल्या आहेत.एकंदरीत सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. दरम्यान आज मतदान पार पडल्यानंतर उद्या बुधवारी मतमोजणी होणार आहे.
शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दि. ६ व
दि. ७ जानेवारी रोजी असे दोन दिवस पालघर जिल्ह्यातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयाला सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणी केंद्र-
तलासरी तालुक्यातील मतमोजणी तलासरी तहसील कार्यालयात होणार असून डहाणू तालुक्यातील मतमोजणी सेंट मेरी हायस्कूल मसूरी येथे, विक्रमगड तालुक्यातील मतमोजणी विक्रमगड पंचायत समिती सभागृह जवळील आदिवासी भवन येथे, मोखाडा तालुक्यातील मतमोजणी क्रांतीवीर राघोजी भांगरे सभागृह पंचायत समिती मोखाडा येथे, वाडा तालुक्याची मतमोजणी पीजी हायस्कूल वाडा येथे, पालघर तालुक्याची मतमोजणी टीमा बोईसर हॉलमध्ये
तर वसई तालुक्यातील मतमोजणी वसई तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे.
वसई तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे ८ गण असून कळंब गटात व कळंब गणात दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडणूक आल्याने वसईत ३ गटात व ७ गणात मतदान होणार आहे. एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत.
–स्वप्नील तांगडे(निवडणूक निर्णय अधिकारी,वसई)