३ एप्रिल १९३५ रोजी धुळे जिल्ह्यातील मोराणे या अत्यंत लहानशा आणि विकासाच्या प्रकाशझोतापासून कोसो दुर असलेल्या खेड्यात भागाबाईंच्या पोटी अॅड्. माधवराव वाघ यांचा जन्म झाला. हा परिसर तसा विकासाच्या प्रवाहापासून दुर; तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा झंझावात येथे येऊन पोहोचला होताच. साहेबांच्या विचारप्रेरणेने नवचेतनेचे बीज येथील सर्वसामान्य माणसाच्या मनात अंकुर घ्यायला लागले होते. त्यामुळेच चार तरणी पोरं तयार असतानाही डोक्यावर कुणाचाही हात नसलेल्या भागाबाईंचे आपल्या पोरांना मोठं करण्याचे स्वप्न तीला स्वस्थ बसु देत नव्हते. जंगलात जाऊन काट्याकुट्यांची पर्वा न करता मोळी बांधणारे हात थकत नव्हते कारण त्या हातांना आपल्या मुलांच्या हातात पुस्तके पाहण्याची आस होती. आजुबाजुची लोक इतकी मोठी मुलं असताना देखील कशाला इतके कष्ट उपसतेस, असे सांगत, तेव्हा भागाबाई फक्त एका वाक्याने त्यांची तोंडं बंद करत. त्या म्हणत, मला माझ्या मुलांना मजुर नाही बाबासाहेब बनवायचंय…आणि याच माऊलीच्या विचारप्रेरणेने मोराण्याचा गबा ऊर्फ माधव देशातील नामांकीत वकीलांच्या यादीत आपली पकड घट्ट करण्याचा प्रवास सुरु करीत होता. धुळे येथून मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर माधवरावांनी धुळे सोडण्याचा निर्णय घेतला आणि अंगावरील एक जोडी कपड्यांवर अनवाणी पायांनी त्यांनी मुंबई गाठली. ज्या सीएसटी स्थानकात ते उतरले तेथेच राहत त्यांनी रेल्वेच्या पहिल्या नोकरीतुन आपल्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. अवघ्या ७० रुपये पगारावर माधवरावांच्या आयुष्याला सुरुवात झाली. याच अल्प कमाईत ते आपल्या आईला आणि भावंडांना देखील शिक्षणासाठी पैसे पाठवत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी स्वत: देखील आपले शिक्षण पुढे चालु ठेवले. नोकरीसोबत शिक्षण घेत दादांनी विधी शाखेची पदवी मिळविली आणि मग रेल्वेतील त्यांच्या नोकरीला त्यांनी पुर्णविराम दिला. शिका, संघर्ष करा या बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी कुर्ला येथे राहत असतानाच वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मुलांसाठी आश्रम शाळा सुरु केली आणि येथुनच दादांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. १९६५-१९६६ दरम्यान कुर्ला येथेच त्यांनी विमोचीत को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीची स्थापना केली. आयुष्यभर कष्ट उपसलेल्या दादांनी आपल्या मुलांसोबतच समाजातील इतर घटकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील कठोर मेहनत घेतली. मुंबईत काम करताना देखील त्यांनी आपल्या मुळाशी नाड कधी मोडली नाही. आपल्या तीनही लहान बंघुंची देखील त्यांनी तेवढीच काळजी घेतली. अनवाणी पायाने मुंबईत आलेल्या दादांना सुरुवातीच्या काळात दोन वेळचे जेवणही परवडणारे नव्हते. त्यामुळेच दादरच्या इराणी हॉटेलच्या एक आण्याच्या थाळीवर त्यांना दोन दिवस काढायला लागायचे. मुंबईत स्टेशनवर राहिलेल्या दादांनी या महानगरात येणाऱ्या लोकांच्या राहण्याची आणि शिक्षणाची अडचण लक्षात घेऊनच आश्रम शाळा चांगल्या पध्दतीने चालवली. याच काळात वकीलीच्या क्षेत्रात देखील दादा नावारुपाला येत होते. याच माध्यमातून त्यांचा समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींसोबत परिचय झाला. यामध्ये माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी केंद्रीय गृह मंत्री सोनुसिंग पाटील आणि व्ही. पी. सिंग ही काही महत्वाची नावे…मोरारजींसोबतचे दादांचे संबंध हे खुपच व्यक्तीगत स्वरुपाचे होते. त्यामुळेच त्यांची शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नेमणुक झाली. मंडल कमिशनच्या समित्यांवर देखील दादांनी खुप महत्वाची कामगिरी पार पाडली. अोबीसी समाजाकरीता देखील दादांनी केलेले काम खुपच मोठे आहे. अोबीसींच्या हक्कासाठी दादांनी काढलेली पुस्तीका आजही आदर्श समजली जाते. याच दरम्यान दादांना अनेक परदेश दौरे करण्याची देखील संधी लाभली. आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. दलीत पॅंथरच्या सुरुवातीच्या काळात दलीत समाजातील समस्या सोडविण्याकरीता दादांनी आपल्या वकीलीचा चांगलाच उपयोग करुन घेतला. 

शिक्षण आणि पुस्तकांचा निस्सीम चाहता असलेल्या दादांचे वाचनही प्रचंड होते. त्यांच्या या वाचनाच्या सवयीतूनच त्यांनी त्यांच्या गावात वाचनालये आणि शिक्षण संस्था सुरु केल्या. समता शिक्षण संस्था पुणे, युनिव्हर्सल एज्युकेशन अॅकेडमी मुंबई, एकलव्य छात्रालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय टाकळीनालंदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय चाळीसगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, नकाणे-मोराणे, धुळे या दादांनी सुरु केलेल्या शिक्षण संस्थांनी आता वटवृक्षाचे रुप धारण केले आहे. दादांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना शानसाने त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कर्मवीर जीवनगौरव पुरस्कार, राज्य सरकारचा समाजोत्थान पुरस्कार ही त्यातील काही महत्वाची नावे. दादांनी खानदेश भवनची स्थापना करुन खानदेशचा आवाज दिल्लीत नेऊन ठेवला. शिवाय दादांच्या संकल्पनेतुन आकारास आलेल्या दुरदर्शन वरील कोर्टाची पायरी या कार्यक्रमाने दादांमधल्या वकिलासोबतच दडलेला निवेदकही महाराष्ट्राला जवळुन पाहता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *