
सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांच्या आंदोलनाला यश














प्रतिनिधी
विरार : महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी संगनमत करून वसईकर जनतेचे सातबारा नोंद व फेरफार आर्थिक फायद्यासाठी रखडवून त्यांना त्रास देत असतील तर या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढळणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी दिले आहे.
वसई महसूल कार्यालयातील तलाठी-मंडळ अधिकारी तीन वर्षांहून अधिक काळ एकाच जागेवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळत असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या व भूमिअभिलेख कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराविरोधात वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलयास डिसिल्वा यांनी 8 मे रोजी वसईतील देवतलाव या ठिकाणी आंदोलन पुकारलेले होते.
वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी या आंदोलनाची दखल घेतली होती. वसईकरांच्या तक्रारींबाबत बैठक घेऊन त्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले होते. त्यानुसार, 14 मे रोजी वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांतील अधिकारी व तक्रारकर्त्या वसईकरांत बैठक पार पडली. या बैठकीत प्रांतधिकारी शेखर घाडगे यांनी सखोल चौकशी करून दोषी तलाठी व मंडळाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान; वसई तालुक्यात आरटीओ विभागाअंतर्गत येणारी वाहने व त्यांचे परवाने नियमबाह्य असताना आरटीओच्याच आशीर्वादाने ही वाहने रस्त्यांवर धावत आहेत. पाणी वाहून नेणारे टँकर, मॅजिक-डमडम अशा नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पंधरवड्याने कारवाईची मोहीम सुरू करण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. याशिवाय; भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यांच्यामार्फत आलेल्या कामांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. नुकताच या कार्यालयात 9 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या खासगी कर्मचारी महिलेसोबत गैरप्रकार घडला होता. वसईकर जनतेने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर या महिलेला कामावरून कमी करण्यात आले होते.
अनेक वर्षांपासून वसईकरांची प्रकरणे प्रलंबित आहेत. आर्थिक फायद्यासाठी अधिकारी जनतेला त्रास देत आहेत. वसईकर जनतेच्या हक्काची जमीन असताना हे अधिकारी कशाआधारे हुकूमशाही करतात? असा सवाल एलियास डिसिल्वा यांनी केला होता. त्यावर भूमीअभिलेख कार्यालयातील तक्रारी संबंधित सर्व प्रकार एसएलआर अधिकाऱ्यांसमोर मांडणार असल्याचे प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले.
अर्नाळा-वसई राज्य मार्गावर जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्याकरता अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यात राहणाऱ्या अनेक नागरिकांना वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, हा मुद्दा देखील डिसिल्वा यांनी या वेळी उपस्थित केला होता. त्यावर बैठकीला उपस्थित पालिकेच्या अभियंत्यांनी 10 टक्के काम शिल्लक असून पावसाळ्याआधी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजेे; उपविभागीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर वसई तालुक्यातील संबंधित सर्व शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर आंदोलनकर्त्यांत एव्हरेस्ट डाबरे, नेल्सन डिसोजा, निलेश वर्तक, रॉबी डिसोजा, विल्सन आल्मेडा, उमेश आल्मेडा आदी उपस्थित होते.
अर्नाळा-वसई राज्य महामार्गाची पाहणी!
अर्नाळा-वसई राज्य महामार्ग दुरुस्तीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका अभियंत्यांनी एलयास डिसिल्वा यांना दिली. महानगरपालिका अभियंत्यांनी एलयास डिसिल्वा यांच्यासोबत या मार्गाची पाहणी करून त्याबाबत माहिती दिली. जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा या कामाला सुरुवात होईल. या जलवाहिनीचे काम पूर्ण होताच पुढील वर्षीपासून सर्वसामान्य वसईकरांना त्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येईल. रस्त्याचे कामही पावसाळ्यानंतर करण्यात येईल. सध्या रस्त्याच्या साईटपट्टीचे काम तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येत असल्याची माहिती पालिका अभियंत्यांनी दिली.