

कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पालघर पोलीस दल अतिशय चोखपणे पार पाडत आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीच्या काळात मद्याची विक्री बंद असल्याने चोरट्या मद्य वाहतुकीला वसई मध्ये फार मोठ्या प्रमाणावर उत आला होता.
दारूची विक्री नेहमीपेक्षा चार पट भावाने केली जात असून सुद्धा मद्यपींचा उत्साह कमी झाला नव्हता. लॉक डाउनच्या काळात मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर मद्याची चोरटी वाहतूक आणि काळाबाजार सुरू झाला होता.
या काळात अंबाडी पूल येथे बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विना परवाना मद्य वाहतूक करणाऱ्या ७०० जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांना ऑनलाइन दंड आकारणी करण्यात आलेली आहे. तसेच जवळपास १०० वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
याच बरोबर लाखो रुपये किमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त करण्यात आलेला असून माणिकपूर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे वसईमध्ये चोरट्या मद्य वाहतुकीला आणि विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.