

वसई: कोरोना महामारीचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीला रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयशी झाल्याचे सांगत राज्यातील भाजपने सरकारविरोधात आंदोलन पुकारले. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा वसई-विरार चे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा वसई रोड मंडळाच्या 35 बुथवर 150 परिवारांनी सहभाग घेत 200 कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरून शासनाच्या नियमांचे पालन करत ‘माझं अंगण माझं रणांगण’ आंदोलनात ठाकरे सरकारविरोधात आपापल्या घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन, काळे झेंडे उंचावून, काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. तसेच भाजपा वसई रोड मंडळचे मध्यवर्ती कार्यालय विशालनगर, साईनगर कार्यालय, कृष्णाटाऊनशिप कार्यालय ओमनगर, एव्हरशाईन सिटी ब्रॉडवे आदी कार्यालयांमध्ये ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ या आंदोलनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला.
कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने “महाराष्ट्र बचाव” आंदोलन सुरू केले आहे, असे यावेळी उत्तम कुमार म्हणाले.
यावेळी भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, रामानुजम, रमेश पांडे, महेश सरवणकर, विनोद कुमार यांनी ठीकठिकाणी आंदोलनाचे नेतृत्व केले.