वसई | प्रतिनिधी

मुंबई-बडोदा महामार्गासाठी वसई तालुक्यातील कशीदकोपार गावातील जमिनी जबरदस्तीने संपादित करण्यात आल्या, पण शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. या साऱ्या प्रकारामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला आहे.

या सगळ्या भ्रष्ट कारभारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक गैरकायदेशीर, अनधिकृत व्यक्ती दररोज वसई प्रांत कार्यालयात मुक्तपणे वावरत असून, तोच या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ना तो सरकारी कर्मचारी, ना अधिकृत अधिकारी — तरीही फायली हाताळतो, निर्णय घेतो आणि व्यवहारांमध्ये थेट हस्तक्षेप करतो!

शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या जमिनी हिरावून घेतल्या जातात, मोबदल्याच्या नावाखाली फसवणूक होते आणि त्यावर टाळं ठोकून प्रांत कार्यालयात एक ‘भ्रष्टकिंग’ आरामात सिंहासन मांडतो — हा प्रकार लोकशाहीच्या गळाच घोटतोय, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

“ही काय प्रांत कार्यालय की खाजगी एजन्टांची बाजारपेठ?”, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे. प्रांत अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय अशा व्यक्तीचा कार्यालयात मुक्त प्रवेश कसा शक्य आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावेच लागेल, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे.

लवकरच या गैरकृत्याचा मुख्य सूत्रधार उघड होणार असून, त्याला तुरुंगात पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे हाल, जमिनींची लूट आणि प्रशासनाचा नपुंसकपणा — या तिहेरी घावांमुळे कशीदकोपार गाव पेटू लागले आहे.

सरकार आणि प्रशासन किती झोपेत आहे? हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर लोकशाहीवरचाच घातक आघात आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *