

वसई विरार मधील कोरोना परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा
वसई दि.२४(वार्ताहर):- लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आणि लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाच्या फोडणाऱ्या पत्रकारांना अनन्य साधारण महत्व असून, वसई-विरारचे आयुक्त अथवा अधिकारी यांनी कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधींना किंवा पत्रकारांना विचारात न घेता त्यांचा अवमान करणे उचित नाही. त्यांचा योग्य मान राखून, वेळप्रसंगी मार्गदर्शन घेणे हे शहर विकासाच्या दृष्ठीने हिताचे असल्याचे प्रतिपादन करून, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरण डी. यांचे आमने-सामने कान टोचले आहेत.
वसई विरार महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना रुग्ण आणि बाधितांच्या वाढलेल्या मृत्युंच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज वसई विरारचा दौरा केला. यावेळी वसई-विरार मनपा प्रभाग समिती ‘आय’ कार्यालय येथे महानगरपालिका आयुक्त गंगाथरन डी. यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीबबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर प्रविण शेट्टी, उप महापौर प्रकाश रॉड्रीग्ज, ‘आय’ प्रभाग सभापती लॉरेल डायस, अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, तहसिलदार किरण सुरवसे, वैदयकीय अधिकारी डॉ.तब्बसुम काझी, भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, नगरसेवक किरण भोईर, भाजप जिल्हा नेते शाम पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात विसंवाद आहे, त्या शहराचा विकास खुंटून वाटोळे झाल्याचा आपला अनुभव आहे. म्हणून कोरोनाशी लढताना पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी सुद्धा समन्वयाची भूमिका घ्यावी, अशी सरळ मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज आयुक्तांकडे केली. आमची ही मागणी मान्य करून प्रशासकीय व्यवस्थेत बदल दिसला नाही तर विरोधी पक्षनेता म्हणून लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून सरकारला ठोस भूमिका घ्यायला लावू अशी ठाम भूमिकाही दरेकर यांनी आज मांडली.
राज्यात सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत. व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाला आता बदलावं लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊन जनतेच्या साथीने आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा श्री. दरेकर यांनी दिला. या प्रसंगी वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडणारे निवेदन दरेकर यांना सुपुर्द केले.
विरारच्या नगरसेविका सौ रिटा सरर्वैया आणि नालासोपाराच्या नगरसेविका सौ शुभांगी गायकवाड यांनी, जनतेच्या प्रश्नांवर निवेदन द्यायला गेल्या असता आयुक्तांनी दोन स्वतंत्र घटनांत आम्हाला सुरक्षारक्षकामार्फत त्यांच्या कॅबिन मधून बळाचा वापर करून हाकलून लावल्याची व्यथा यावेळी कथन केली.तर ऍम्ब्युलन्स आणि व्हेंटिलेटर बाबत बैठकीत चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगून, पालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती माया चौधरी यावेळी म्हणाल्या, “आम्ही आयुक्तांकडे प्रश्न, समस्या सांगायला जातो त्यावेळी खुर्चीत बसून असलेले आयुक्त ‘बसा ‘ सुद्धा म्हणत नाहीत.”
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी सांगितले की, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. म्हणून कोरोनाचे संकट ओढावल्यापासून राज्यभर दौरा करत हॉस्पिटलची पाहणी आणि प्रशासनाशी चर्चा करत व्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय .अशा प्रकारच्या बैठकांच्या माध्यमातून विविध प्रशासकीय यंत्रणेतील कमतरता समजून यंत्रणा गतिशील व्हायला मदत व्हावी यासाठी आमचा दौरा उपयुक्त ठरतोय. पालघर जिल्ह्यात साधारणतः ३ हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण असून २,२०० च्या आसपास रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आहेत. १०० हून अधिक मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत नेमकं काय चुकतंय? प्रशासन कुठे कमी पडतय? त्याचा लेखाजोखा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठीत घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे मृत्यू झाला आहे समजू शकतो कारण ही आपत्ती सर्वांवर आली आहे. परंतु, आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडपणा हा जर मृत्यूला कारणीभूत असेल तर त्याला प्रशासन आणि सरकार त्यासाठी जबाबदार असते हे वारंवार सरकारला ठणकावून सांगितले आहे. याची अनेक उदाहरण सरकार समोर ठेवली आहेत. कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होतो, तर कधी रुग्णालयाच्या दारात नेले व ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू होतो, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणून मृत्यू होतो, कोरोनाचे निदान झाले नसल्याने चार चौघात गेला प्रादुर्भाव झाला म्हणून कोरोना प्रादुर्भाव होतोय. या सर्व व्यवस्थेमधील उणिवा आहेत. या उणिवा मृत्युला कारणीभूत असतील तर याचा दोष संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जातो मग ती महापालिका असो वा सरकार. म्हणून या व्यवस्थेत दुरुस्ती व्हावी आपण आयुक्त व संबंधित अधिका-यांसोबत येथील गंभीर परिस्थितीचा आढावा घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांचा समवेत झालेल्या आढावा बैठकीत ज्या व्यवस्था आहेत त्या बळकट केल्या जातील, रुग्णवाहिका परिपूर्ण नाही त्या सुरळीत करण्यात येतील, उपलब्ध खाटा, रुग्णवाहिका, हॉस्पिटल यांची माहिती देणारे डॅशबोर्ड, अर्थात वॉररूम तयार करण्यात येईल, असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मेडिकल ऑफिसर ची आवश्यकता असून यासंदर्भात राज्याच्या सचिवांना किंवा आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार असून प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही हा विषय सांगण्यात येईल. मेडिकल ऑफिसर तातडीने उपलब्ध होईल, या साठी पाठपुरवा करण्यात येईल, त्याचप्रमाणे या ठिकाणी खाटा, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,फिजिशियन आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी सकारातमक सूचना दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
संवादातून वस्तुस्थिती समजते त्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आणि आपण पालघर जिल्ह्यात दौरा करतोय. याच माध्यमातून प्रशासनाला काही मदत असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाकडे दबाव टाकून ती मदत उपलब्ध करुन दिलेली आहे. पालघर जिल्ह्यात प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची विभिन्न मते आहेत. प्रशासनच्या म्हणण्यानुसार आरोग्य व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना केल्या आहेत. त्याच वेळेला येथील अनेक गोष्टी नीट कार्यान्वित होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. ही येथील वस्तुस्थिती आहे. ज्या गोष्टी उपलब्ध आहेत सांगितल्या जातात त्या उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ २० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगितले जाते परंतु ५ आहेत,पुरेसे व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यातील काही नादुरुस्त आहेत.अशाप्रकारच्या अनेक बाबी या दौऱ्यात नोंद करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलेही अधिकारी किंवा आयुक्त यांना मनमानी करता येणार नाही. तरी,प्रशासनाने लोक प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम यांच्या बैठका घेऊन संवाद साधावा,त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे .असे सूचित करून देखील आयुक्तांची वेगळी भूमिका राहिली तर आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दरेकर यांनी दिला. पालिका आयुक्त,लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांच्या सुसंवादातून कोरोनाच्या संकटाला एकजुटीने तोंड देण्यात येत आहे असा संदेश समाजात जावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी वसई-विरारा महापालिका हद्दीतील जिजी कॉलेज आणि रिध्दिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील क्वारांटाईन सेंटर ला ही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
