
मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार सावंत याला विकलाच कसा हा प्रश्न असून सदर प्रकरणी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. जे अधिकारी या प्रकरणात सामील आहेत त्या सर्वांवर विना विलंब कारवाई व्हावी.
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर केल्या प्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १९/५/२०२२ रोजी गुन्हा दाखल झाला मात्र अद्याप पर्यंत आरोपींना अटक झालेली नाही. सदर प्रकरणात अनिलकुमार सावंत याच्यावर गुन्हा का दाखल नाही केला ? अनिलकुमार सावंत याला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे धोवली सर्वे नंबर १०४ / अ येथील ३ एकर २० गुंठे शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत नामक इसमाला देण्यात आला असून त्याच्या नावे सात बारा घडविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रीया अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात आली. मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत याला का देण्यात आला हा प्रश्न आहे.
या भूखंडावर २० झोपड्या होत्या. त्या २० झोपड्यांवर अनिलकुमार वामन सावंत याने बुलडोजर फिरवून त्या झोपड्या तोडून टाकल्या. लोकांना धमक्या देऊन घरातून बाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरविणे हा गंभीर गुन्हा असून सदर प्रकरणी अनिलकुमार वामन सावंत याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
सदर ठिकाणी राहणारे रहिवासी ज्यांची घरे अनिलकुमार वामन सावंत याने तोडून त्यांना बेघर केले आहे ते सर्व लोक गरीब असून त्यांना कोणी वाली नाही!
ज्या झोपड्या तोडण्यात आल्या त्या १५ वर्षे जुन्या होत्या. नियमानुसार १२ वर्षे वास्तव्य असेल तर त्या वास्तुवर कब्जाधारकाची मालकी होते. अनिलकुमार वामन सावंत याला ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने सदर रहिवाशांना हटविणे अशक्य असल्यामुळे अनिलकुमार वामन सावंत याने रहिवाशांना धमकावून त्यांना घरे खाली करायला लावून ती घरे तोडून टाकली.
घरे तोडल्या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून ७ तक्रारदारांनी तक्रार करून वसई पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्याकरिता आग्रह करीत होते. मात्र पोलिसांनी प्रवीण वर्तक व राकेश चौधरी या दोघांवर भादंविसक ४४८, ४२६, ४२७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विकासक अनिलकुमार वामन सावंत याला वसई पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जाते.
अनिलकुमार वामन सावंत याने गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरविल्याचे वृत्त परिसरात पसरताच युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी घटनास्थळी जाऊन बेघर झालेल्या लोकांची भेट घेऊन त्यांना घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. पहिल्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र गुन्हा दाखल केला. या कामात भारतीय जनता पक्षाचे वसई शहर मंडळ चिटणीस अमित पवार, कोंकण विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुशील ओगले, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक तसनिफ़ शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावून गुन्हा दाखल केला.
आरोपींना अटक न झाल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्याकडे विचारणा केली असता आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अटकपूर्व जामीन घेतला तरी कधी ? हा प्रश्न असून सदर प्रकरणी माहिती अधिकार अर्ज दाखल करून माहिती मागविण्यात आली आहे.