समाजसेवक एलयास जोसेफ डिसिल्वा यांचे आयुक्तांना निवेदन

माफक दरात, दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्याची मागणी

प्रतिनिधी

विरार : वसई-विरार महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करताना ग्रामीण परिसरातील प्रवाशांची गरज व सुरक्षितता लक्षात घेतलेली नाही. किंबहुना; महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा पर्याय बंद करून महापालिकेनेे वसई-विरार पश्चिम पट्टीतील हजारो प्रवाशांसमोर अडचण निर्माण करतानाच त्यांच्या जीवितास धोका निर्माण केलेला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजसेवक एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी व्यक्त केली आहे.

वसई-विरार पश्चिम पट्टीतील अनेक गावांना रात्री-अपरात्री योग्य व वेळेत सेवा मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून त्यांनी वसई-विरार पश्चिम पट्टीतील गावांना परिवहन सेवा देताना ही सेवा माफक दरातील, दर्जेदार आणि सुरक्षित होईल, यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवेऐवजी वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्र आणि परिसरातील प्रवाशांना सेवा देण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने 2011 साली घेतलेला होता.

यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेइतकीच माफक दरात, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा महापालिका देईल, अशी अपेक्षा वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना होती. प्रत्यक्षात; वसई-विरार महापालिका परिवहन सेवेने प्रवाशांचा पुरता अपेक्षाभंग केलेला आहे.

वसई-विरार पश्चिम पट्टीतील अनेक गावांना योग्य व वेळेत सेवा मिळत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा मंडळाच्या एसटी रात्री ०२ वाजेपर्यंत या गावांना सेवा देत होत्या. येथील प्रत्येक आळीपर्यंत जाऊन प्रवाशांना सुखरूप त्यांच्या घरी सोडण्याची जबाबदारी पार पाडत होत्या.

महापालिका परिवहन सेवेने मात्र याबाबत अत्यंत बेजबाबदारपणा व बेफिकिरी दाखवलेली आहे. महापालिकेची परिवहन सेवा रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू असते. परिणामी रात्री 8 नंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांना अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यासाठी त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. शिवाय; महापालिका परिवहन मुख्य रस्त्यापर्यंतच सेवा देत असल्याने रात्री-अपरात्री या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला-मुली व वृद्ध व्यक्तींना मुख्य रस्ता ते त्यांच्या घरापर्यंत पायी प्रवास करावा लागतो. अशा प्रसंगी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे, याकडे या निवेदनातून आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

दरम्यान; परिवहन सेवा सुरू करते वेळी महापालिकेने ग्रामीण परिसरातील प्रवाशांची गरज व सुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक होते; परंतु तशी कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. त्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा पर्याय बंद करून महापालिकेनेे वसई-विरार पश्चिम पट्टीतील हजारो प्रवाशांसमोर अडचण निर्माण करतानाच त्यांच्या जीवितासही धोका निर्माण केलेला आहे. ही समस्या दूर करून वसई-विरार पश्चिम पट्टीतील गावांना माफक दरात, दर्जेदार आणि सुरक्षित सेवा द्यावी, यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना डिसिल्वा यांनी केल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *