वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर परिसरातील सुमारे 69 गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सध्या भेडसावू लागला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न कळीचा ठर असताना त्यावर शासकीय पातळीवर कोणतेही ठोस धोरण निश्‍चित करण्यात आले नसल्याचे सांगत 69 गावांच्या प्रलंबित पाणीप्रश्‍नावर तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना केले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात विवेक पंडित म्हणतात, मी वसई विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करित असताना वसई तालुक्यात एकूण 69 पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. त्या बांधलेल्या जलकुंभांना आज 7 वर्ष होऊन गेली तरी त्यात अजूनही पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे वसईतील जनतेला टँकरमधून पाणी मागवावे लागते. परंतु टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी हे दुषित स्वरूपाचे असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याबाबत वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करूनही या प्रश्‍नावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे कळले नाही.
या 69 गावांच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत 30 ऑक्टोबर 2018 च्या बैठकीत हा प्रश्‍न मांडला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा विभाग व नगर विकास विभाग यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देशही दिले होते. परंतु आज 7 महिने होऊनही तशी कोणतीच बैठक आयोजित केल्याचे कळविण्यात आलेले नाही.
याप्रश्‍नी विवेक पंडित यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत ताबडतोब एका महिन्यात कारवाई केली जाईल यासंबंधीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत जेणेकरून वसईच्या जनतेची या त्रासातुन सुटका होईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *