वसई / विशेष प्रतिनिधी :
करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. केंद्र व राज्य शासन त्याला आला घालण्यासाठी तोडीस तोड प्रयत्न करताना दिसून येते. मात्र नेमके करोनाला रोखण्यासाठी वसई विरार शहर महापालिका तोंडावर उताणी पडलेली दिसून येते. सुरूवातीला स्थानिक वर्तमानपत्रांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वसई विरार शहर महापालिकेला पालिका हद्दीत औषध व धुर फवारणी करण्याचे शहाणपण सुचले होते. त्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे. दोन दवाखाने पालिका प्रशासनाच्या बेफीकीर कारभारामुळे अक्षरश: सील करावे लागले आहेत. त्यात सोशल डिस्टनशिंगचे धिंडवडे उडवणारे नागरिक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागलेत. भाजीपाला मार्केट, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने याठिकाणी नागरिक सामान, भाजीपाला विकत घेण्यासाठी सर्वच शासकीय नियमांना हरताल फासून झुंबड उडवत आहेत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा इतका टोकाला गेलाय, की महापालिकेकडून त्याची साधी दखल घेतली जात नाहीय, हेच दुर्दैवं. महापालिकेला आधी आयुक्त नव्हते. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांना नेमकी परिस्थिती कशी हाताळायची याचे शहाणपण अवगत नव्हते हे एकवेळ समजू शकते. मात्र आता नवे आयुक्त डी.गंगाथरन यांच्या रूपाने प्राप्त होऊनही पालिकेचा कारभार इतका धसमुसळा कसा? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. वसई विरार शहर महापालिकेच्या तुलनेत इतर महापालिका प्रशासनांचे नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले की लगेच कठोर पावले उचलली जातात. मात्र नेमके वसई विरार शहर महापालिकेलाच हे का जमत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. सोशल डिस्टनशिंगचे पालन न करणार्‍या नागरिकांमुळेच पोलिसांच्या डोक्याभोवतीचा ताप वाढला आहे. आयुक्त डी. गंगाथरन व पालिकेच्या नऊही प्रभागांतील संबंधित प्रभारी साहाय्यक आयुक्तांचा हाच बेजबाबदारपणा कायम राहणार असेल तर वसई विरार शहर महापालिका परिसर कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही.

 

परवाने नसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई का नाही?
आधीच करोना विषाणूचा फैलाव जोमाने वाढत असताना वसई विरार शहर महापालिकेने डोळ्यांत तेल घालून खबरदारी घेणे गरेजेचे आहे. मिरा भाईंदर व मुंबई शहर महानगरपालिकेच्या तुलनेत वसई विरारमधील करोना विषाणूचा होत असलेला फैलाव अत्यंत धोकादायक आहे. अशावेळी सोशल डिस्टनशिंग यासह अन्य खबरदार्‍या घेतल्या जात आहेत की नाही यावर महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांचे खासकरून आयुक्तांचे व संबंधित प्रभारी सहआयुक्तांचे लक्ष असणे नितांत गरजेचे आहे. मात्र आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे परवाना नसलेले भाजीपाला विक्रेते ठिकठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यामुळे करोना विषाणूच फैलाव वाढला तर महापालिकेची आधीच चाचपडत असलेली आरेग्य यंत्रणा त्याविरोधात लढणार तरी कशी? याचे भान आयुक्त डी. गंगाथरन यांना असायला हवे, हीच नागरिकांची प्रमुख मागणी आहे.

पोलिसांच्या डोक्यालाच आणखी किती ताप देणार?
सध्याच्या आपत्ती काळात नागरिकांनी कसे वागले पाहिजे, शासनाच्या तळमळीने होणार्‍या आवाहनाकडे किती काळजीने पाहिले पाहिजे याचे गांभिर्यच नागरिकांत उरलेले दिसत नाही. जे बेजबाबदार वागतात त्यांच्यावर म्हणूनच पोलीस कारवाई करतात. मात्र जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली निष्काळजीपणे सोशल डिस्टनशिंग धाब्यावर बसवून घराबाहेर झुंडीने उतरणारे नागरिक पोलीस आणखी किती काळ सोसणार आहेत. या नागरिकांना निर्बंध घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी जबाबदारीने पावले उचलली पाहीजेत, मात्र तेच उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यांच्या उदासीन वागण्यामुळे पोलिसांच्या डोक्याभोवतीचा ताप वाढला आहे.

नालासोपार्‍यात सोशल डिस्टनशिंगचे धिंडवडे
नालासोपारा पूर्वेतील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलकापुरी परिसर तसेच सनशाईन परिसरातील नागरिक तर अक्षरश; बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात. याठिकाणी संध्याकाळी नागरिक झुंडीच्या झुंडीने बाहेर पडून भाजीपाला तसेच इतर जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी भाहेर पडतात. या नागरिकांमध्ये करोना विषाणूला घेऊन कोणतेही गांभिर्य उरलेले नाही हे त्यांच्या बेफीकीर वागण्यावरून दिसून येते. अलकापुरी, सनशाईन परिसरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच करोनाचे रूग्ण आढळले आहेत. मात्र या दोन्ही परिसरातील नागरिकांची संख्या पाहता याठिकाणी विषाणूचा स्फोट झालाच काय स्थिती ओढवेल याची कल्पनाही न केलेली बरी. महापालिका आयुक्त डी.गंगाथरन यांना हा नागरिकांचा बेजबाबदारपणा दिसत नाही का? का या बेफीकीर नागरिकांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

कनिष्ठ अभियंता जयेंद्र पाटील यांचा भाजीपाला विक्रेत्यांना सज्जड दम
आचोळे विभागाचे कनिष्ठ अभियंता जयेंद्र पाटील हे अधिकारी सध्या त्यांच्या विभागात त्यांना प्राप्त होणार्‍या तक्रारींवर कारवाया करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी नालासोपारा पूर्वेतील परिसरात सर्वच शासकीय नियमांना तिळांजली वाहून भाजीपाला विक्रेत्यांनी लावलेले स्टॉल हटवून नागरिकांना सोशल डिस्टनशिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.

इतर विभागातील अधिकारी बेजबाबदार भाजीपाला विक्रेत्यांची मनमानी का सहन करत आहेत?
महापालिकेच्या नऊ प्रभागांत भाजीपाला विके्रत्यांमुळे सोशल डिस्टनशिंगचे पालन होताना दिसत नाही. नागरिक भाजीपाला घेण्यासाठी झुंडीने घराबाहेर पडत असल्याने मोक्षा पेच निर्माण झाला आहे. इतर प्रभागांत भाजीपाला विक्रेते परवाना नसताना कोठेही बस्तान मांडून भाजीपाला विकण्यासाठी बसत आहेत. त्यांच्यावर संबंधित प्रभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त अजिबात कारवाई करताना दिसून येत नाहीत. सदर अधिकारी या भाजीपाला विक्रेत्यांची मनमानी का सहन करत आहेत. असा सवाल विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed