
वसई । वार्ताहर ः सागरी सुरक्षा करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या सर्व अनधिकृत रिसाॅर्ट आणि त्यात चालणाऱ्या अनैतिक धंद्यांवर कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्वा यांनी अर्नाळा पोलीसांकडे केली आहे.
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील अर्नाळा,नवापूर,राजोडी,कळंब,भुईगाव या समुद्रकिनाऱ्यांवर मागील काही वर्षांत प्रचंड पर्यटन वाढले आहे. पर्यटकांच्या सेवेत अनेक रिसॉर्ट,हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ स्टॉल्स कार्यरत आहेत.या ठिकाणी येणाऱ्यांत तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय आहे.मात्र, त्यातून अनैतिक व्यवसाय वाढीस लागले आहेत.अनेक रिसॉर्ट,हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर तसेच समुद्रकिनाऱ्यावर तरुण-तरुणी रात्रभर ड्रग्ज, हुक्का आणि मद्यपान करत बसलेले असतात.बहुतांश रिसॉर्ट आणि हॉटेल्समधून नियमबाह्य मद्य विक्री आणि देहविक्रीही केली जाते.जोडप्यांना अनैतिक संबंधांसाठी रुम उपलब्ध करुन दिले जातात.सुरक्षा यंत्रणांचा त्यावर वचक नसल्याने या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य तणावाचे वातावरण लक्षात घेता समुद्रीमार्गे दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याआधी याच मार्गांनी दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केला असल्याचे सिद्ध झाले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अर्नाळा पोलिसांनी सागरी सुरक्षा बंदोबस्त करण्यासोबतच या परिसरातील अनैतिक व्यवसायांना आळा घालावा.ज्या रिसॉर्ट-हॉटेल्समधून नियमबाह्य ड्रग्ज,हुक्का,मद्य विक्री केली जाते,ते बंद करण्यात यावेत,तरुण-तरुणींना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधनात्मक मोहीम राबवावी.शेतीपूरक व स्थानिक तरुणांच्या परंपरागत व्यवसाय वृद्धीस चालना मिळेल, अशा पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत.तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व समुद्रकिनाऱ्यांवर सकाळ,संध्याकाळ,रात्रीच्या वेळेत गस्त घालण्यात यावी,तसेच रात्री १० नंतर पर्यटकांना समुद्रकिनारी फिरण्यास मज्जाव करण्यात यावा.अशी मागणी ही डिसील्वा यांनी अर्नाळा पोलीसांकडे केली आहे.