
वसई (प्रतिनिधी) – सातिवली येथील मौर्यानाका परिसरात असलेल्या राजदीप इंडस्ट्रियल प्रिमाइझेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड, पोटमाळा व इतर वाढीव बांधकाम चालू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.
संबंधित प्रकरणात सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, हेच अधिकारी ७ एप्रिल रोजी डाईस बिल्डिंगच्या मागे असलेल्या बौद्ध समाजातील गरीब महिलांच्या टपाऱ्यांवर तातडीने कारवाई करताना दिसले होते. स्थानिक दलित समाजाचा आरोप आहे की, गरीबांवर कठोर कारवाई करणारे प्रशासन प्रस्थापित उद्योगपती व बिल्डरांवर मात्र सौम्य भूमिका घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहित ससाणे यांनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठवत स्पष्ट केले की, “जर दलितांच्या टपाऱ्यांवर कारवाई केली जाते, तर श्रीमंत व बांधकाम व्यावसायिकांवरही तशीच कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही पीडित दलितांसह ‘भीक मागो आंदोलन’ करणार आहोत.”
या प्रकरणावर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, स्थानिक स्तरावर वाढत चाललेल्या असंतोषामुळे हे प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
