

पाटणा : हाथरस अत्याचार प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सणसणीत प्रतिक्रीया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. उत्तरप्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, हे यातून स्पष्ट होते. ते बिहार दौऱ्यावर असताना पाटणा येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली.*
उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणाने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा. अशी मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.