
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओखळ आहे.
प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचा कोरोनामुळे रविवारी रात्री सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. रात्री १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओखळ आहे. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता.
चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांचं देहावसान झालं. मृत्यूसमयी ते ८१ वर्षांचे होते.
१९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहचवला.