
प्रतिनिधी | वसई, २६ मे – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता श्री. सतीश शिंगाणे यांना पदावरून गेले एक महिना झाला आहे. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रातील चार प्रभाग समित्यांसाठी अद्याप नवीन उपअभियंता नेमण्यात आलेले नाहीत.
शिंगाणे हे प्रभाग समिती I, प्रभाग समिती-H (माणिकपूर), प्रभाग समिती-D (आचोळे), आणि प्रभाग समिती-G (वालिव) या चार प्रभागांमध्ये कार्यरत होते. त्यांच्या अनुपस्थितीनंतर या भागांतील विविध विकासकामे, मंजुरीसंबंधी प्रक्रिया आणि बांधकाम परवानग्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी कामे रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, “महापालिकेकडे योग्य अधिकारी नाहीत का?” असा प्रश्न विचारला जात आहे. यासोबतच, “जर स्थानिक पातळीवर पात्र अधिकारी उपलब्ध नसतील, तर कायद्याप्रमाणे लोकसेवा आयोगामार्फत नवीन उपअभियंते नेमले जात नाहीत का?” असा सवालही केला जात आहे.
या विभागातील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही अधिकृत नेमणूक न झाल्याचे दिसून येते. परिणामी, प्रलंबित कामे अधिकच खोळंबत असून, मंजुरीसाठी नागरिकांना सातत्याने कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलून रिक्त पदासाठी पात्र व नियुक्त अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.