
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर करणाऱ्या अनिलकुमार सावंत याच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच शासकीय भूखंड अनिलकुमार सावंत याच्या घशात घालण्यासाठी प्रशासनाने प्रचंड वेगाने हालचाली करीत सात बारा फेरफार व गट बूक नकाशा आदि सर्व कामात चपळता दाखविल्या बद्दल सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून सदर फेरफार रद्द करावा.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे धोवली सर्वे नंबर १०४ / अ येथील ३ एकर २० गुंठे शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत नामक इसमाला देण्यात आला असून त्याच्या नावे सात बारा घडविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रीया अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात आली. मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत याला का देण्यात आला हा प्रश्न आहे.
या भूखंडावर २० झोपड्या होत्या. त्या २० झोपड्यांवर अनिलकुमार वामन सावंत याने बुलडोजर फिरवून त्या झोपड्या तोडून टाकल्या. लोकांना धमक्या देऊन घरातून बाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरविणे हा गंभीर गुन्हा असून सदर प्रकरणी अनिलकुमार वामन सावंत याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
सदर ठिकाणी राहणारे रहिवासी ज्यांची घरे अनिलकुमार वामन सावंत याने तोडून त्यांना बेघर केले आहे ते सर्व लोक गरीब असून त्यांना कोणी वाली नाही! विशेष म्हणजे ते लोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ही घेऊन गेले नाहीत. त्यांनी अशी भीती बोलून दाखविली की, पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार ही घेतली जाणार नाही. मात्र कोणत्याही स्थितीत अनिलकुमार वामन सावंत व अन्य इसमांवर गुन्हे दाखल केले जातील.
ज्या झोपड्या तोडण्यात आल्या त्या १५ वर्षे जुन्या होत्या. नियमानुसार १२ वर्षे वास्तव्य असेल तर त्या वास्तुवर कब्जाधारकाची मालकी होते. अनिलकुमार वामन सावंत याला ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने सदर रहिवाशांना हटविणे अशक्य असल्यामुळे अनिलकुमार वामन सावंत याने रहिवाशांना धमकावून त्यांना घरे खाली करायला लावून ती घरे तोडून टाकली. सदर प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल केले जातील.