

दिल्ली – नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लवकरच महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण समजली जाते. दोन्ही नेत्यांमध्ये कोणती सविस्तर चर्चा झाली ते समजू शकलेले नसलं तरी ईव्हीएम हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.
सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी मुख्य निवडणूक आयुक्तांची ठरल्याप्रमाणे भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान आजच्या सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत ईव्हीएमच्या मुद्यावरून तीव्र आंदोलन पेटवण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यात मनसे अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतं अशा आजच्या एकूणच घडामोडी संकेत देत आहेत.