
प्रेत जळण्यास २४ तासाच्यावर, प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती समोर
नालासोपारा :- पश्चिमेकडील एकमेव समेळगाव येथे स्मशानभूमी आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे जास्त लोकसंख्या असल्याने मृत्युदर ही त्याप्रमाणात आहे. याठिकाणी विद्युत शवदाहिनी बसवली पण अद्याप पर्यंत महापालिकेला ही विद्युत शवदाहिनी सुरू करण्यास मुहूर्त मिळत नाही. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडे ठेवण्याची कोणती ही सोय नसल्याने पावसामुळे लाकडे भिजल्याने अंत्यसंस्कारावेळी प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लाकडे भिजलेली असल्याने अंत्यसंस्कारावेळी अडचण निर्माण होत आहे. लाकडे ओली असल्याने ते पेटत नाही. त्यामुळे किमान ८ ते १० टायर आणि डिझेलचा भरपुर वापर करून ही प्रेत जळण्यास २४ तास लागतात. काही प्रेत अर्धवट जळत असल्याने यामुळे प्रेताची विटंबना होत असल्याचा आरोप रूचिता नाईक यांनी केली आहे. या प्रकारामुळे नागरीक आणि मृतांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते आणि बराच वेळ वाया जात असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली.
स्मशानभूमीत सुपरवायझर एकच असल्याने त्यांची वेळ सकाळी ७ ते ३ आहे. ३ नंतर व रात्रीच्या वेळेस सुपरवायझर नसल्याने येथिल कर्मचारी यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्मशानभूमीची दुरूस्ती तसेच सोयीसुविधा व विद्युत शवदाहिनी सुरू करण्याबाबत प्रभाग समिती ई चे सहाय्यक आयुक्त वनमाळी व प्रभाग समिती बांधकाम विभागाचे अधिकारी संख्ये तसेच स्मशानभूमीची देखभाल करणारे थोरात यांची त्वरीत हकालपट्टी करून सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी कॉंग्रेसच्या रूचिता नाईक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.