वसई | प्रतिनिधी

वसई तालुक्यातील जुचंद्र गावात शासकीय यंत्रणेच्या विश्वासाला तडा जाणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशाविना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार करून, थेट कायद्याची पायमल्ली केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, प्रशासनावर विश्वास उरलेला नाही, असे रोषाने सांगण्यात येत आहे.

तहसीलदारांनी नकार दिला, तरी फेरफार झाला!
प्राप्त माहितीनुसार, जुचंद्र गावात काही व्यक्तींनी फेरफारासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र सदर फेरफार तहसीलदारांनी तिनदा स्पष्टपणे नाकारला. त्यांनी कोणतेही लेखी आदेश दिले नसतानाही, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा देत परस्पर फेरफाराची नोंद केली.
हे केवळ अधिकारांचा गैरवापर नाही, तर थेट शासकीय सत्तेचा अवमान आहे.

माहिती अधिकारात स्फोटक खुलासा
या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे माहिती अधिकारात अर्ज केला असता, उत्तरात असे नमूद करण्यात आले की –
“सदर फेरफाराची कोणतीही अधिकृत साचवलेली नोंद (संचिता) उपलब्ध नाही.”
यावरून स्पष्ट होते की हे संपूर्ण प्रकरण गुपचूप आणि अनधिकृतरीत्या रेटण्यात आले आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता फेरफार केल्याचे ही माहिती स्पष्ट करते.

खाजगी व्यक्तींना शासकीय कामात सामील करण्याचा प्रकार
या प्रकारावरच थांबत नाही – शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार खाजगी व्यक्तींना शासकीय कामात सहभागी करण्यास बंदी असतानाही, जुचंद्र गावात २ ते ३ खाजगी व्यक्ती बिनधास्तपणे शासकीय कागदपत्रांवर काम करत असल्याचेही समोर आले आहे.
ही काय तहसील कार्यालय आहे की खासगी दलालांची बाजारपेठ?, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

प्रशासन बधणार की पुन्हा डोळेझाक करणार?
तहसीलदारांनी जेव्हा स्पष्ट आदेश दिलेले नव्हते, तेव्हा या अधिकाऱ्यांनी कोणाच्या परवानगीने फेरफार केला? आणि खाजगी व्यक्तींना अधिकार नसताना त्यांनी शासकीय कामात सहभाग कसा घेतला?
या सर्व प्रकारांची चौकशी होऊन संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

“हा भ्रष्टाचार नाही, तर थेट कायद्याचा खून आहे!”
हा प्रकार केवळ भ्रष्टाचारापुरता मर्यादित नाही, तर थेट प्रशासनाच्या गळ्याला फास देणारा आहे.
जर कारवाई झाली नाही, तर जुचंद्र गावात तीव्र आंदोलन पेटेल, असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रशासन आता जागं होणार का, की पुन्हा जनतेच्या आवाजाला झापडं लावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *