
वसई :
वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २१ क (वसई-गाव) मधून शाहीद शेख उर्फ ‘मुन्ना भाई’ यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत. भूमिपुत्र, जनसंपर्क असलेले आणि वादविरहित प्रतिमेचे उमेदवार म्हणून शाहीद शेख यांच्याकडे पाहिले जात असून, त्यामुळेच राष्ट्रवादीची ताकद या प्रभागात वाढल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही शाहीद शेख यांची ओळख आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांसाठी संधी आणि व्यापारी वर्गाच्या अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळेच “हा आमच्यातलाच उमेदवार” अशी भावना वसईकरांमध्ये दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्धार अनेक कार्यकर्ते व मतदारांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, शाहीद शेख यांची उमेदवारी जाहीर होताच प्रभागात प्रचाराला वेग आला असून, विविध सामाजिक घटकांकडून त्यांना पाठिंबा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
१५ जानेवारीला वसईचा कौल स्पष्ट होणार असून, शाहीद शेख यांना बहुमत मिळणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रभाग २१ क मध्ये शाहीद शेख विरुद्ध इतर उमेदवार अशी थेट लढत रंगणार असून, या लढतीत स्वच्छ प्रतिमा आणि विकासाचा अजेंडा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, शाहीद शेख यांच्या उमेदवारीमुळे वसईच्या राजकारणात नवचैतन्य आले असून, “विकासासाठी नवा चेहरा” अशी चर्चा आता गल्लीपासून चौकापर्यंत सुरू झाली आहे.
