
वसई:
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचूबंदर परिसरात भंगार व्यावसायिकांकडून तांबे काढण्याच्या उद्देशाने कचऱ्याला जाळले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अवैध प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले असून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना लावलेल्या आगीमुळे दाट धूर पसरला आहे, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. मात्र, केवळ आग विझवून प्रश्न सुटणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील रहिवाशांना, विशेषतः लहान मुले व वृद्धांना श्वासनाचे आजार आणि डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रभाग समिती ‘आय’च्या हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही स्थानिक प्रशासन व वॉर्ड अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.कचऱ्याला आग लावून पर्यावरणाचा व नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.स्थानिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी महापालिका प्रशासन कधी जागे होणार आणि संबंधितांवर कायदेशीर बडगा उगारणार, याकडे संपूर्ण पाचूबंदर परिसराचे लक्ष लागले आहे.

