
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी आजपासून जिल्हा पातळीवर प्रेस कॉन्फरन्सद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. आज वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
आपलं अपयश झाकण्यासाठी आणि लोकांचं लक्ष केंद्र सरकारच्या अपयशापासून इतरत्र वळवण्यासाठी हे भाजपाचे प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्टपणे उलगडून सांगितलं. पेट्रोल, डिझेलची इंधनवाढ, स्वैपाकाच्या गॅसच्या दरात विलक्षण वाढ आणि त्यामुळे महागाई वाढली आहे. सात वर्षे मोदी सरकारला झाली. परंतु सात वर्षांत जे काम केलंच नाही ते केलं म्हणून सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न राहिला आहे.
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारने अतिशय परिश्रमपूर्वक कोविडच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणलं आहे. आता सध्या सर्वात जास्त काळजी घेण्याचा काळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याचा हा काळ आहे. त्यावेळी गर्दी करून कसं चालेल. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषविली आहेत. आता ते भाजपामध्ये गेले आहेत. मात्र कोविड प्रादुर्भावाच्या काळात अशाप्रकारची यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे त्यांना कळायला हवं होतं. ते अमित शाह किंवा जे. पी. नड्ढा यांना तसं सांगू शकले असते. पण पब्लिसिटी स्टंटचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी लोकांचं आरोग्य वेठीस धरलं.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचे दूरगामी परिणाम देशावर झाले आहेत. तेव्हाही आयसीएमआर, डब्लूएचओ, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला संकेत देत होते. इशारा देऊन सावध करत होते. सोशल डिस्टन्सिंग बाळगा, मास्क लावा याबद्दल आवर्जून सांगत होते. मात्र त्या कालखंडात भाजपाने निवडणुका लादल्या, गर्दीच्या समारंभांना परवानग्या दिल्या. त्याचे भीषण परिणाम झाले.
भाजपाशासित राज्यांमध्ये आणि बनारस घाटावर एकावेळी २५ ते ३० मृतदेहांना अग्नी दिला जात होता. मृतदेह नदीत वाहून जाताना दिसत होते. ते पाहून देश हादरून गेला. मात्र भाजपाकडून सारं काही आटोक्यात असल्याचं भासवलं जात होतं. अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्याप्रयुक्त्या भाजपा नेत्यांकडून आखल्या जात आहेत. लोकांनी भाजपाच्या या दिखाव्याच्या राजकारणात अडकू नये.
केंद्रात विरोधी पक्षांनी एकत्रितपणे येऊन आवाज उठवला की भाजपाचे नेते सांगतात, सगळे विरोधी पत्र एकत्रित आले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही. असं असेल तर मग भाजपा गेली अनेक दशके एनडीएमध्ये का राहिला आहे. इतका आत्मविश्वास असेल तर भाजपाने एनडीएमधून बाहेर पडून दाखवावं.
असं आव्हान क्लाइड क्रास्टो यांनी या वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून केलं.
वसई-विरारचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक या वार्ताहर परिषदेस उपस्थित होते.
