एमआरटीपी व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करा ;लाच प्रकरणातील आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व तलाठी विलास करे-पाटील यांची चौकशी करून कारवाई करा !



वसई(प्रतिनिधी)
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील कामण येथील अग्निकांडात भस्मसात झालेल्या बेकायदेशीर परफ्युम कंपनीला ९९,५०,०००/- ची नुकसान भरपाई मिळावी, असा पंचनामा वसईचे लाचखोर मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व तलाठी सजा ससूनवघरचे तलाठी विलास करे-पाटील यांनी केला आहे. सदर अग्निकांडात जखमी झालेल्या व अन्य घरांना झालेल्या नुकसानीबाबत पंचनाम्यात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे चुकीचा पंचनामा रद्द करून नव्याने पंचनामा करावा. परफ्युम कंपनीला अजिबात नुकसान भरपाई दिली जाऊ नये.

दि १६ डिसेंबर २०२१ रोजी पोमण ग्रामपंचायत हद्दीतील शाष्टीकर पाडा परिसरात एका परफ्यूम कंपनीला आग लागली होती. या आगीत ६ ते ७ कामगार जखमी झाले होते तर परफ्यूम कंपनीच्या ८ गोडावून सह आजूबाजूला असलेली १२ घरे जळून खाक झाली होती. या अग्निकांडानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या परफ्यूम कंपनीच्या मालकांनी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या रितसर परवानग्या न घेतल्याची बाब समोर आली होती. याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या ही प्रसिद्ध झाल्या होत्या. विशेष म्हणजे अनधिकृतपणे गाळे उभारून त्यात आपली परफ्यूम कंपनी अजयकुमार सिंह व प्रवीण शहा यांनी थाटली होती. शिवाय ज्या जागेवर कंपनी उभारली होती ती मौजे पोमण सर्व्हे नं १७२ ही नं. १ ही जागा रमेश घाटाळ नामक स्थानिक आदिवासीची
कब्जावहीवाटीची असून ते या जागेत शेती व शेतीपूरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होते. रमेश घाटाळ यांनी सदर जागेची भूमी अभिलेख कार्यालय वसई मार्फत जमीन मोजणी केली असून मोजणी नकाशात आगीत भस्मसात झालेली परफ्यूम कंपनी ५ गुंठे जागेत अतिक्रमण करून उभारल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागेंद्र सिंह नामक परप्रांतीय व्यक्तीने हे अतिक्रमण करून ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी ५ गुंठे जागेत बेकायदेशीर गाळे उभारले होते. विशेष म्हणजे रमेश घाटाळ यांच्या जागेच्या लगत सर्व्हे नं १६९ हिस्सा नंबर ३ ही जागा आहे. या जागेची कागदपत्रे जोडून रमेश घाटाळ यांच्या जागेत बांधलेल्या गाळ्यांना पोमण ग्रामपंचायत कार्यालयाकडून अजयकुमार सिंह व प्रवीण शहा यांच्या नावाने घर क्र.२७२३ व घर क्र २७२४ या क्रमांकांच्या घरपट्ट्या लावून घेतल्या होत्या. या घरपट्ट्या लावताना संबंधितांनी रमेश घाटाळ यांच्या जागेची कागदपत्रे सादर करून ग्रामपंचायत प्रशासनाचीही दिशाभूल केलेली आहे. तसेच त्या जागेत बेकायदेशीरपणे परफ्यूम कंपनी चालू करून परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला होता.
या परफ्यूम कंपनीच्या अतिक्रमणाबाबत जमीन मालक रमेश घाटाळ यांनी संबंधित विभागाकडे तक्रार ही केली होती. दरम्यान या अतिक्रमणाला ग्रामपंचायत कार्यालयाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटीस जारी करुन कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु या नोटीसला परफ्यूम कंपनीचे मालक अजयकुमार सिंह व प्रवीण शहा यांनी केराची टोपली दाखवत आजपर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यातच १६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत लगतच्या १२ घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या आगीच्या घटनेची सखोल चौकशी होणे अपेक्षित होते. परंतु नुकतेच लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आलेले मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व ससुनवघर तलाठी सजाचे तलाठी विलास करे-पाटील यांनी आगीच्या घटनेची कोणतीही शहानिशा न करता तसेच बाधित स्थानिक आदिवासी जमीन मालकाचा जबाब न नोंदवता परफ्यूम कंपनीच्या मालकांना वाचविण्यासाठी चुकीचा अहवाल वसई तहसीलदार कार्यालयाकडे सादर केला. शिवाय पंचनामा सादर करताना या आगीत बाधित १२ घरांच्या नुकसानीचा तपशील सादर केलेला नाही. विशेष म्हणजे अजयकुमार सिंह व प्रवीण शहा यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली होती. शिवाय भरवस्तीत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून ही परफ्यूम कंपनी थाटली होती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडे सादर केलेल्या पंचनाम्यानुसार परफ्यूम मालकांना नुकसान भरपाई न देता भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष सुधारित पंचनामा सादर करण्याचे आदेश पारित करावेत तसेच या आगीस कारणीभूत असलेले अजयकुमार सिंह व प्रवीण शहा यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. शिवाय या आगीत बाधित १२ घरांची नुकसानभरपाई वसूल करून घेण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *