
प्रतिनिधी , मिरा-भाईंदर
मिरा-भाईंदरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर मेट्रोच्या रूपाने आज एक महत्त्वाचा तोडगा निघाला. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंगळवारी पार पडले. या सुविधेमुळे उपनगरातील प्रवाशांचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘थंडगार’ आणि वेगवान होणार आहे.
आज ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता पार पडलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर डिंपल मेहता उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही मेट्रो मार्गिका सर्वसामान्यांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली.
या पहिल्या टप्प्यामुळे काशीगाव ते थेट अंधेरी (पूर्व) असा प्रवास सुलभ होणार आहे. मुंबईच्या दिशेने दररोज कामासाठी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची रस्ते वाहतुकीतील कोंडीतून मोठी सुटका होणार आहे. दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास न सोसता नागरिक आता थेट मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत.
- विस्तार: मेट्रो-९ पुढे भाईंदर पश्चिमेपर्यंत जाणार असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे.
- कनेक्टिव्हिटी: ही मार्गिका दहिसर येथून मेट्रो-७ (अंधेरी पूर्व) आणि मेट्रो-२ अ (डी.एन. नगर) शी जोडली गेल्यामुळे प्रवाशांना अखंडित प्रवास करता येणार आहे.
- सुविधा: सर्व स्थानकांवर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
”मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारणे ही काळाची गरज आहे. आजच्या या लोकार्पणानंतर मिरा-भाईंदरच्या विकासाला अधिक चालना मिळेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
